गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार
गडचिरोली, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील चुरचुरा हे गाव आता १०० टक्के गॅस सिलेंडरचे गाव झाले असून, ते पूर्णपणे धूरमुक्त झाले असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. चुरचुरा गावाचा हा आदर्श आता संपूर्ण राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
जंगलावरील अवलंबित्व संपवून मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार,चुरचुरा येथे आयोजित गॅस सिलेंडर वितरण कार्यक्रमात राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते. “एकही गाव आणि एकही घर असे राहू नये जिथे चूल पेटवण्यासाठी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागेल, असा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेल्यावर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यजीव संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ही महत्त्वाची उपाययोजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात चुरचुरा ग्रामपंचायत सभागृहाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यापूर्वी चुरचुरा गावातील ९२ कुटुंबांकडे गॅस जोडणी होती, मात्र ७२ कुटुंबे या सुविधेपासून वंचित होती. आता या सर्व ७२ कुटुंबांना दोन सिलेंडरसह गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यमंत्री जयस्वाल यांनी गावाला ‘उत्पादक’ बनविण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले, जेणेकरून आर्थिक उलाढाल वाढून संपन्नता येईल. ग्रामीण जनतेचा वकील म्हणून आपण विधानसभेत प्रश्न मांडत असल्याचे सांगत त्यांनी विकसित गडचिरोलीसाठी सर्वांच्या सहभागाची गरज व्यक्त केली.