राज्य प्रतिनिधी- पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माघी गणेशोत्सवात प्रतिष्ठापना केलेल्या प्राधान्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीमूर्तींचे विसर्जन आपल्या नजिकच्या कृत्रिम विसर्जन तलावातच करावे तसेच शाडूच्या मूर्तींचेही विसर्जन पर्यावरणशील दृष्टीकोन जपत कृत्रिम विसर्जन तलावात करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी 22 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती. परिमंडळ उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त आणि त्यांची यंत्रणा सज्ज ठेवण्यात होती.
त्यास अनुसरुन संपूर्ण महापालिका क्षेत्रात माघी गणेशोत्सवातील एकूण 1430 श्रीमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात 68 शाडूच्या आणि 770 पीओपीच्या अशा 838 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात बेलापूर विभागात 106 पीओपी मूर्ती, नेरुळ विभागात 100, वाशी विभागात 82, तुर्भे विभागात 70, कोपरखैरणे विभागात 95, घणसोली विभागात 200, ऐरोली विभागात 84 व दिघा विभागात 33 अशा प्रकारे आठ विभागांत 22 कृत्रिम विसर्जन तलावांवर एकूण 770 पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली दोन्ही परिमंडळात उपायुक्त श्री.सोमनाथ पोटरे व श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्व आठही विभागांच्या विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत सर्वच नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली महापालिका क्षेत्रात 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळे निर्माण करण्यात आली होती. विदयुत व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. विसर्जन स्थळावरील ओले व सुके निर्माल्य लगेच उचलून नेण्यासाठी निर्माल्य वाहतूक वाहने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली सज्ज होती. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य पथकेही कार्यरत होती. तसेच अग्निशमन जवान आणि स्वयंसेवकही कार्यरत होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून दिलेला असल्याने नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपला. महानगरपालिकेने केलेल्या सर्व प्रकारच्या चोख व्यवस्थेमुळे माघी गणेशोत्सवातील श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुनियोजित पध्दतीने निर्विघ्नपणे पार पडला.