vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

                    बुलडाणा, प्रतिनिधी आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या’ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन–प्रशासनाचा उपक्रम न राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले.

  केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, अ. भा. आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष प्रो. राकेश शर्मा, महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र त्रिगुणा आदी यावेळी उपस्थित होते.

     राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, मन व शरीर या दोहोंचे संतुलन साधून संतुलित व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा मंत्र योग व आयुर्वेदातून मिळतो. ‘आरोग्यं परमं सुखम्’ ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर हे सर्व कर्तव्ये पूर्ण करण्याचे साधन आहे. देशाला सशक्त बनविण्यासाठी नागरिकांचे जीवन आरोग्यपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग, आयुर्वेद, युनानी आदी आयुष पद्धती महत्वाची भूमिका बजावतात

   आयुष मंत्रालयातर्फे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना, आयुष औषधालये, औषधे परीक्षण प्रयोगशाळा, वैश्विक पारंपरिक चिकित्सा केंद्राचे पुनरूज्जीवन अशी महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत. याबरोबरच औषधी वनस्पतींचे संवर्धन, क्षेत्रविस्तार होणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी यावेळी सांगितले.

   राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, भारतीय आहारपद्धतीत पूर्वापार औषधी तत्वे असलेल्या वनस्पतींचा वापर होत आला आहे. व्यक्तीला कधीही आजारपण उद्भवू नये अशी सोय आपल्या पारंपरिक ज्ञानावर आधारित जीवनपद्धतीत होती. तथापि, आता आहारात अनावश्यक पदार्थांचा अंतर्भाव झाल्याने आजार वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुर्वेद व आयुष पद्धतींचा प्रसार आयुष मंत्रालयातर्फे होत आहे. तो अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

     केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, निरामय जीवनशैली, ’वेलनेस’ व ’समग्र स्वास्थ सुरक्षा’ ही ’आयुष’ची आधारशीला आहे. जग आज ’वेलनेस’कडे वळले असून, भारतातील प्राचीन व पारंपरिक आयुष पद्धतीच्या संवर्धन व अवलंबामुळे आपला देश संपूर्ण जगात अग्रेसर ठरेल. औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल. महाराष्ट्रातही वेगळे आयुष मंत्रालय असावे यासाठी प्रयत्न होत आहेत. आयुष चिकित्सा व उपचारपद्धतीचा लाभ विदर्भ व महाराष्ट्रातील गरजूंना मिळावा यासाठी हा राष्ट्रीय आरोग्य मेळावा शेगावात आयोजित केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 पालकमंत्री श्री. जाधव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आयुर्वेद क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ वैद्यांना यावेळी गौरविण्यात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डतर्फे आयुष मंत्रालयाला मिळालेले प्रमाणपत्र राष्ट्रपती महोदयांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. वैद्य श्री. कोटेचा यांनी प्रास्ताविक केले. अ. भा. आयुर्वेद महासंमेलनाचे महासचिव वैद्य एस. एन. पाण्डेय, मेळाव्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य सतीश भट्टड, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक नीलेश तांबे आदी उपस्थित होते.

मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये-   * देशातील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नागरिकांची विनामूल्य आरोग्य तपासणी व आयुष पद्धतीने औषधोपचार   * विविध आयुष औषध उत्पादक कंपन्या, सरकारी संस्था, संशोधन केंद्र आणि नामांकित महाविद्यालयांच्या वतीने महत्वपूर्ण माहिती देणारे कक्ष        * वनौषधी प्रदर्शन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (नागार्जुन वनौषधी उद्यान) यांच्या सौजन्याने दुर्मिळ वनौषधींचे दर्शन व शेतक-यांसाठी कार्यशाळा     * आयुष चिकित्सा पद्धतीवर विद्यार्थी, डॉक्टर, सामान्य नागरिक यांच्यासाठी विविध माहितीपूर्ण व्याख्याने

नियोजित कार्यक्रम :* दि.26 फेब्रुवारी दुपारी 12 वा. प्रशिक्षण, घरचा वैद्य – आजीबाईंचा बटवा घरगुती आयुर्वेदिक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण. दुपारी 3 वाजता कार्यशाळा शेतकरी बांधवांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन    * दिनांक 27 फेब्रुवारी सकाळी 10 ते 4 वाजता शिबिर : वयोश्री व ADIP तपासणी आणि साहित्य वाटप शिबिर, दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी. सकाळी 11 वा. : व्याख्यान- शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन       * दिनांक 28 फेब्रुवारी सकाळी 10 ते 3 वाजता शिबिर- मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबिर.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

vishwatmaklokswamivarta

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन