vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकांनी आपले हक्क स्वतःहून राबवून घ्यावेत – न्यायमूर्ती रोहित वासुदेव जोशी**देसाईगंज येथे विधीसेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात*

*लोकांनी आपले हक्क स्वतःहून राबवून घ्यावेत – न्यायमूर्ती रोहित वासुदेव जोशी**देसाईगंज येथे विधीसेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात*

गडचिरोली, प्रतिनिधी नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून ते स्वतःहून राबवून घ्यावेत आणि आवश्यक असल्यास त्यासाठी प्रयत्न व संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रोहित वासुदेव जोशी यांनी केले.

देसाईगंज येथील तालुका क्रीडा संकुलात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि देसाईगंज तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विधीसेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच सीआरपीएफचे कमांडंट सत्यप्रकाश उपस्थित होते.

न्यायमूर्ती जोशी यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय या मूलभूत तत्वांचा उल्लेख केला. न्याय हा केवळ न्यायालयापुरता मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक स्तरावर पोहोचला पाहिजे. शासनाच्या योजना व सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हीच खरी न्यायव्यवस्था आहे, असे त्यांनी नमूद केले.

आजच्या काळात माहिती हीच सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन ती आपल्या परिसरातील किमान दहा नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क त्याच्या दारी मिळावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांनी नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आणि अत्याचारांना आळा घालण्यासाठी कायद्याने दिलेल्या अधिकारांची तसेच विविध शासकीय योजनांची व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कायदेशीर अधिकार व शासकीय सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हेच या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत माहिती घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अतिदुर्गम भागात प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ माध्यमातून महसूल मंडळ स्तरावर प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीएफ कमांडंट सत्यप्रकाश, देसाईगंज तालुका वकील संघाचे अध्यक्ष बी.डी. उके तसेच तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अंकुश खानोरकर यांनी कार्यक्रमाची माहिती देताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

मेळाव्यादरम्यान अनेक महिला व पुरुष लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुदानाचे धनादेश, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर ट्रॉली, आटा चक्की, बेबी केअर किट, अंत्योदय कार्ड, राशन कार्ड तसेच उत्कृष्ट घरकुल बांधकाम प्रमाणपत्र यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय पोलीस, न्याय, आरोग्य, महसूल, कृषी व पशुवैद्यकीय विभागांच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते.

कार्यक्रमाचे संचालन ॲड. सोनाली मेश्राम व स्नेहा मेश्राम यांनी केले, तर न्यायाधीश सुबोध भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या मेळाव्यास परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिध्द

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta

रोहिदास पाटील यांच्या निधनानेधुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta