
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारासाठी आता संकेतस्थळावर अर्ज करावेत
जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादनात देशात अग्रगण्य असून, शेती क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारने आता आधुनिक पाऊल उचलले आहे. विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी राबवण्यात येणारी पारंपारिक ऑफलाईन पद्धत बंद करून, आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. इच्छुक शेतकरी, संस्था किंवा गटांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in जाऊन ‘कृषी पुरस्कार’ या टॅबवर क्लिक करून आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
यापूर्वी कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये सादर करावे लागत असत. यामध्ये छपाई, झेरॉक्स आणि प्रवासाचा मोठा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागत होता. तसेच, ऑफलाईन पद्धतीमुळे पडताळणी आणि संकलनासाठी मोठा कालावधी जात असे. ही प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पुरस्कार निवडीची विश्वासार्हता अधिक वाढणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण व शेतीमित्र, जिजामाता कृषिभूषण (महिलांसाठी), उद्यानपंडित व युवा शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न (अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी) पुरस्कार देण्यात येत असतात. असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-



