उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत
अहिल्यानगर, प्रतिनिधी : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम सन २०२५-२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस व फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ वरील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात दि. २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
हा पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येईल. याशिवाय दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी आदी धरणांच्या जलाशयांवरून; तसेच दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्यांच्या पात्रातून आणि गोदावरी नदीवरील विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे हे पाणी दिले जाईल.
धरणांमधील उपलब्ध पाण्यातून प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल आणि उर्वरित पाण्यातून शेतीसाठी कालव्यांच्या आवर्तनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे