सुरक्षित अन्नासाठी तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवा- संभाजी अडकुणे
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी. नागरिकांना खाद्यपदार्थ सुरक्षित आणि दर्जेदार मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने वेळोवेळी विविध आस्थापनांची तपासणी करून अन्न , खाध्यपदार्थ नमुने यांची तपासणी प्रभावीपणे करावी. असे निर्देश अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी दिले. हॉटेल, स्वीटहोम ,दूध व पनीर दुग्धजन्य पदार्थ विक्रेते , यांच्याकडून वेळोवेळी नमुने घेऊन तपासणी करावी व भेसळ प्रकरणी दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले.
जिल्हास्तरीय अन्नसुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील. आरोग्य अधिकारी डॉ.सारिका भावले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सरला गाडेकर, सहायक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, प्रयोगशाळा विश्लेषक एस. बी बादाडे, उपशिक्षण अधिकारी दीपाली थावरे,व संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी खाद्यपदार्थांच्या विक्री करणारे दुकानदार ,दूध, पनीर ,तूप ,भगर ,खाद्यतेल बर्फी व तसेच इतर खाद्य पदार्थांच्या मध्ये भेसळ होऊ नये यासाठी वारंवार स्वीट मार्ट आणि हॉटेल व विक्रेत्याच्या दुकानांची तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे व उत्पादन करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे यांनी दिले. भेसळ करणाऱ्यां दुकानदारावर प्रतिबंध आणि दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवानेही निलंबित करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीव जागृती करणारे उपक्रम राबवावेत जेणेकरून सुरक्षित अन्न आणि आरोग्य अबाधित राहील.
एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये दोन कोटी ४२ लाख १५ हजार ५९ किमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या विविध तक्रारीचे निराकरण करून संबंधित आस्थापनावर तपासणी व कायदेशीर कारवाई करण्यात येते. यामध्ये १३० प्रकरण न्यायप्रविष्ट असून ३० प्रकरण निकाली निघाले असल्याचे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांनी प्रस्ताविकात सांगितले.