
*ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या मॅपिंगसाठी विशेष मोहीम; २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी*
*ठाणे, प्रतिनिधी* भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार देशभरातील ९ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचा पहिला टप्पा राबवला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या नावांचे ‘मॅपिंग’ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत सध्याच्या मतदार यादीतील नावांची तुलना सन २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जुन्या मतदार यादीशी केली जाणार आहे.
यासंदर्भात १५०-ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी प्रीती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे मॅपिंग करण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे सन २००२ च्या मतदार यादीत आधीपासूनच समाविष्ट आहेत, अशा मतदारांचे ‘पर्सन टू पर्सन’ (Person to Person) मॅपिंग केले जाईल. याउलट, ज्या नवीन मतदारांची नावे २००२ च्या यादीत नाहीत, अशा मतदारांचे त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या २००२ मधील नावांच्या तपशिलावरून ‘प्रोजेनी मॅपिंग’ (Progeny Mapping) केले जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या २००२ सालच्या सर्व मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना या प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी निवडणूक आयोगाने https://voters.eci.gov.in ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर जाऊन मतदार स्वतःचे किंवा आपल्या पालकांचे २००२ च्या यादीतील जुना भाग क्रमांक आणि अनुक्रमांक शोधू शकतात.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील सर्व सोसायट्यांमध्ये ही मॅपिंग प्रक्रिया दि.११ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. या काळात केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या माहितीची नोंदणी करणार आहेत.
मतदार नोंदणी अधिकार्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे २००२ च्या मतदार यादीतील तपशील तयार ठेवावेत. सोसायट्यांमध्ये जेव्हा बीएलओ (BLO) अधिकारी येतील, तेव्हा त्यांना ही माहिती देऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव योग्यरित्या मॅप करून घ्यावे.
ही प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक मतदारयादी तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने, सर्व मतदारांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000000



