अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा- विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
अमरावती, प्रतिनिधी : राज्य शासनातर्फे गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या प्रामुख्याने ग्रामस्तरावरील आत्मनिर्भरता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यात नागरिकांचा सक्रीय सहभाग राहणार असल्याने या अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागीयस्तराचा शुभारंत उत्तमसरा, ता. भातकुली येथे आज पार पडला. तसेच स्वच्छताही सेवा उपक्रम, राष्ट्रीय पोषण माह, सेवा पंधरवडा या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या एम., उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, उपायुक्त राजीव फडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, गटविकास अधिकारी तुषार दांडगे, सुनिल राणा, सरपंच धमेंद्र मेहरे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. सिंघल म्हणाल्या, गावांना समृद्ध पंचायत राज अभियानात चांगले काम करून बक्षीस जिंकण्याची संधी आहे. या अभियानात गावाला सुंदर करावे. सेवा पंधरवड्यात प्रामुख्याने शेतरस्ते मोकळे करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच घरकुलासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात एकही जण बेघर राहणार नाही. यासाठी होणाऱ्या सर्व्हेक्षणामध्ये नाव नोंदणी करावी. जिल्ह्यात गाव तेथे स्मशानभूमी व्हावी, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यात गावांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच सशक्त नारी अभियानातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अभियानात निश्चित केलेल्या मानकानुसार कार्य केल्यास अभियानात बक्षीस जिंकण्याची संधी आहे. राजस्व अभियानात शेतरस्ते, घरकुल, सातबारा आदी क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सामान्य महसुली बाबी आणि भटक्या विमुक्तांसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात राज्यभरातील चांगल्या ग्रामपंचायतींशी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे गावाने एकत्रित प्रयत्नांनी उत्साहात या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी, अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्रत्येकाने अभियानात योगदान दिल्यास राज्यस्तरावर यश मिळणे शक्य होईल. महिलांसाठी पोषण अभियान राबविण्यात येत असले तरी यात पुरूषांनी सहभागी व्हावे. तसेच स्वच्छताही सेवा आणि स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानात महिलांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले.
यावेळी फुलंब्री, जि. छत्रपती संभाजी नगर येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच उमेदच्या 27 बचतगटांना दिड कोटी रूपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच सातबारा, शिधापत्रिका, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सरपंच धमेंद्र मेहरे यांनी प्रास्ताविक केले.