सांगली, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, सांगली चे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटाकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या नवउद्योजकांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून घेतले आहे, त्यांनी संबंधित बँकेचे शिफारस पत्र व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली (जुना बुधगाव रोड, सांगली) येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.