
महिला
सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा
राज्य प्रतिनिधी-ग्रामीण मातीत रुजलेली कष्टाची बीजे जेव्हा जिद्द, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या पाण्याने सिंचित होतात, तेव्हा त्यातून उगवते यशाची हिरवीगार शेती. अशीच एक प्रेरणादायी कार्यगाथा म्हणजे श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड, सहाय्यक कृषी अधिकारी, चिरनेर (ता.उरण, जि. यगड) यांची. कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांच्या जीवनात स्वावलंबनाचा नवा उजेड निर्माण केला आहे
आधुनिक तंत्रज्ञानातून स्वावलंबनाची वाट,महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’ (ATMA) योजनेच्या माध्यमातून श्रीम. गायकवाड यांनी महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा ध्यास घेतला. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन ऑयस्टर मशरूम लागवडीसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांनी महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखविला.Krishi Vigyan Kendra Roha येथे आवश्यक प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देत महिलांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी दिली.केवळ २० किलो बियाण्यांमधून ४० किलो उत्पादन मिळवत, अवघ्या ७७० रुपयांच्या खर्चात २३ दिवसांत १६,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याचा मार्ग त्यांनी महिलांसमोर उभा केला. या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडून आला आणि महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलले.
सामूहिक संघटनातून उभारलेली यशाची साखळी“ एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या विचाराचा अवलंब करत त्यांनी महिलांना स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून संघटित केले. बियाणे, खते व आधुनिक यंत्रसामग्रीच्या टंचाईवर मात करत सामूहिकतेच्या बळावर महिलांना सक्षम केले.याचबरोबर उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी स्थानिक सोसायट्या, आठवडी बाजार, हॉटेल्स व उपहारगृहे यांच्याशी संपर्क साधून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळू लागले.
मार्गदर्शनाची सशक्त परंपरा,या कार्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भक्कम मार्गदर्शन लाभले. मा. श्रीम. वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), मा. श्रीम. अर्चना सुळ-नारनवर, तालुका कृषी अधिकारी, उरण, तसेच श्रीम. अलका बुरुकुल (उपकृषी अधिकारी) आणि श्रीम. नमिता वाकळे (BTM, आत्मा) यांच्या प्रेरणादायी सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.श्रीम. सोनाली संतोष जाधव यांच्यासारख्या महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांनी परिसरातील अनेक महिलांना उद्योग-व्यवसायाकडे वळविले आणि लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
समाजसेवेचा व्यापक आविष्कार,कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित न राहता समाजसेवेच्या विविध क्षेत्रांतही त्यांनी मोलाचे योगदान दिले. महिला सबलीकरण, जेष्ठ नागरिकांना सहाय्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, धार्मिक संस्थांना मदत, तसेच कोरोना काळात अन्नदान यांसारख्या उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. महिला मेळावे, परिसंवाद, हळदी-कुंकू समारंभ आणि विविध बैठकींमधून त्यांनी समाजजागृतीचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले
पुरस्कारांनी सन्मानित कार्य,त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल विविध वृत्तपत्रे व संस्थांनी घेतली. त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल “संजीवन कलाविकास प्रतिष्ठान तेजस्विनी पुरस्कार” आणि “हिरकणी पुरस्कार” यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. हे पुरस्कार त्यांच्या अथक परिश्रमांची आणि समर्पित सेवाभावाची साक्ष देतात.प्रेरणादायी संदेशश्रीम. सुषमा गायकवाड यांचे कार्य हे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि अथक परिश्रम यांच्या संगमाचे उत्तम उदाहरण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास महिला शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.ग्रामीण भागातील महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य, त्यांच्या हातात आलेले उत्पन्नाचे साधन आणि प्रगतीच्या नव्या संध—हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे.
समारोप,जिद्द, चिकाटी आणि साहस यांच्या बळावर स्वतःसह समाजाचा विकास साधण्याचा दृढ निश्चय बाळगून कार्य करणाऱ्या श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची ही कार्यगाथा आज अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली आहे. ग्रामीण विकासाच्या दिशेने उचललेले त्यांचे प्रत्येक पाऊल हे महिलांच्या सर्वांगीण उन्नतीचे नवे पर्व लिहित आहे.
त्यांच्या कार्यातून उमटणारा संदेश स्पष्ट आहे—“स्वकष्ट, स्वसामर्थ्य आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर ग्रामीण भारतातील प्रत्येक महिला आत्मनिर्भर होऊ शकते.”
श्रीमती संजीवनी जाधवसहायक संचालक,विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई तथाप्र.माहिती अधिकारीजिल्हा माहिती कार्यालयरायगड-अलिबाग
0000000000000000



