जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..
रायगड – अलिबाग, प्रतिनिधी : जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद रायगड यांच्या अहवालानुसार इयत्ता १२ वीची परीक्षा दि. १६ जून ते ८ जुलै २०२६ आणि इयत्ता १० वीची परीक्षा दि. १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत होणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील (नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र वगळून) सर्व परीक्षा वितरण केंद्रे व परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन, पेजर यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरातील एसटीडी बूथ, झेरॉक्स मशीन व फॅक्स मशीन बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षेसाठी आवश्यक साहित्याव्यतिरिक्त इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य वापरण्यासही बंदी राहणार आहे.
याशिवाय प्रत्येक पेपर सुरू होण्याच्या एक तास आधीपासून ते पेपर संपल्यानंतर एक तासापर्यंत परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश अथवा वावर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.