
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे,कणगर येथे अचानक भेट देऊन कामाची केली पाहणी; सरपंचांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले
अहिल्यानगर, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणनापत्रे भरून घेत आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सक्रिय सहकार्य करून गणनापत्र वेळेत भरून द्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केले.
शनिवारी सुट्टीच्या दिवशीही उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी राहुरी तालुक्यातील कणगर गावाला अचानक भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. पाहणीदरम्यान गावचे सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र भरले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर श्री. गाढे यांनी स्वतः त्यांच्या समक्ष त्यांचे गणनापत्र भरून घेतले. तसेच उपस्थित ग्रामस्थांना मोहिमेचे महत्त्व पटवून देत प्रत्येक पात्र मतदाराने गणनापत्र भरून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, गणनापत्र भरून न दिल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यास अथवा नाव कायम राहण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरी भेट देतील, तेव्हा नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन गणनापत्र भरण्यास सहकार्य करावे. कुटुंबातील सदस्य बाहेरगावी असल्यास त्यांच्या वतीने कुटुंबप्रमुखाने गणनापत्र भरून द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.



