
जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,प्रत्येक नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पाहोचविण्यास शासन कटीबध्द – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, प्रतिनिधी – शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट, सुलभ आणि प्रभावीपणे पोहोचविणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ हे शासनाचे लोकाभिमुख पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचत असून प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवून त्यांचे समाधान साधले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज समाधान शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उदघाटन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, पंचायत समिती सभापती अयोध्या खिस्ते, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसिलदार शिवाजी मगर, शीतल कच्छवे, सहायक निबंधक बी.एस. नांदापूरकर आदींसह सर्व विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशाताई आणि मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, महसूल व इतर शासकीय विभागांच्या सेवा सुलभ करणे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलनाने शिबीराचे उदघाटन झाले.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात हे अभियान उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडले आहे. या अभियानाचा एकच उद्देश आहे, शासनाच्या कोणत्याही योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहता कामा नये. आज शासन स्वतः नागरिकांच्या दारी जाऊन सेवा देत आहे. महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. एकल महिलांच्या सन्मानपूर्ण आणि सुरक्षित जीवनासाठी स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून, त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे.



