S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%
नवी मुंबई प्रतिनिधी – दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रामधील कर्णबधीर, अंध, अध्ययन अक्षम, मतिमंद व बहुअपंगत्व अशा सर्व विभागांतील दहावीची परीक्षा देणा-या विशेष मुलांनी आपली १००% निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश मिळवले आहे व दिव्यांगत्व असले तरी शैक्षणिक प्रगतीत आपण कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या यशस्वी मुलांचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विशेष कौतुक केले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इटीसी केंद्रातील एकूण 19 विशेष मुले दहावी शालांत परीक्षेस बसले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मतिमंद विभागातून कु.कल्याणी अवटे हिने 85 % संपादन करीत सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. तिच्यासह मतिमंद विभागातून एकूण १४ विशेष मुलांनी सुयश प्राप्त केले आहे. त्यापैकी विनायक पाटील व रिया शिंदे या दोघांना पालक मार्गदर्शनाद्वारे इटीसी केंद्रातून मदत देण्यात आली होती. या व्यतिरिक्त मतिमंद विभागातूनउ त्तीर्ण होणा-या विशेष मुलांमध्ये मंथन थोरात, द्रोण मढवी, अब्दुल खान, तेजस शेट्टी, विश्लेष कुवर, मंदार रणदिवे, तन्म़य कळंबे, आयुष घाडगे, विनायक चव्हाण, स्वरा पाडळे, ईश्वरी दांडगे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कर्णबधीर विभागातून मारीया नागलेकर हिने 77.60% गुण प्राप्त केले आहेत. तर अध्ययन अक्षमता विभागातून निषाद दवे याने सुयश प्राप्त केले आहे.
अंध विभागातून सूरज भोसले याने दररोज इटीसी केंद्रात दररोज उपस्थित राहत तर श्रावणी बोरे हिने पालक मार्गदर्शनाद्वारे यश संपादन केले आहे. बहुविकलांग विभागातून सोहम पाटील याने यश प्राप्त केले आहे.या मुलांमध्ये काही मुले ही इंग्रजी माध्यमातून तर काहींनी मराठी माध्यमातून हे यश मिळवले आहे. तसेच मुलांनी शैक्षणिक अभ्यासासोबत इतर अभ्यासेतर उपक्रमातही उत्साहाने सहभाग घेतला होता. इटीसी केंद्राच्या संचालक उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिलारे यांनी या मुलांच्या यशाबाबत समाधान व्यक्त केले आहे तसेच या विदयार्थ्यांनी पुढेही असेच यश मिळवावे व आपल्या पायावर उभे रहावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. या मुलांच्या यशामागे इटीसी केंद्रातील शिक्षक, थेरपिस्ट़ यांची विशेष मेहनत आहे. या मुलांना सतत प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन, समुपदेशन करण्याचे काम केंद्रातील मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.