
१० लाख रुपयांची मदत बँक खात्यात जमा; मॅनहोल दुर्घटनेतील दिवंगत असलम शेख यांच्या पत्नीकडून पत्र लिहून महानगरपालिकेचे आभार-श्रीमती अंजुम शेख यांनी महापौरांप्रति व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई प्रतिनिधी-कुर्ला मधील खैरानी मार्ग येथील मॅनहोल दुर्घटनेत मृत्यू ओढवलेले, साकीनाका (यादवनगर) येथील रहिवासी असलम शेख यांच्या पत्नी श्रीमती अंजुम शेख यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. संकटाच्या काळात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तत्परतेने दिलेला आधार आणि महानगरपालिका प्रशासनाने वेळेत केलेली मदत याबद्दल श्रीमती अंजुम शेख यांनी पत्र पाठवून महापौर, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
दिनांक २ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या दुर्घटनेनंतर शेख कुटुंबाची भेट घेऊन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांत्वन केले. तसेच शेख कुटुंबाची गरजू परिस्थिती पाहता महापौर श्रीमती रितू तावडे यांनी १० लाख रुपयांचे सहाय्य तत्काळ देण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले होते. त्या निर्देशानुसार, महानगरपालिकेच्या एल विभाग (कुर्ला) कार्यालयाने पाठपुरावा करून बँक खात्याचे तपशील व वारसाहक्क कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी ही १० लाख रुपयांची रक्कम श्रीमती अंजुम शेख यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आली.
मदत मिळाल्याची लेखी पोच महानगरपालिकेकडे सादर करताना श्रीमती अंजुम शेख यांनी पत्रात सारांश रुपात नमूद केले की, “कुटुंबावर कोसळलेल्या अत्यंत कठीण प्रसंगी महापौरांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली. या प्रक्रियेत मार्गदर्शन व सहकार्य करणारे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महापौर व महानगरपालिका अधिकाऱ्यांची मी आभारी आहे.”
“कुटुंबातील कर्ता माणूस गमावल्याचे दुःख मोठे आहे, त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही; मात्र या निराधार कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य होते. श्रीमती अंजुम शेख यांच्या पत्रातील भावना महानगरपालिका प्रशासनाला अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे बळ देणाऱ्या आहेत.” — श्रीमती रितू तावडे, महापौर, मुंबई
#mybmcupdates



