
भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडचा करणार सामना…
क्रिकेट प्रतिनिधी
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
मेलबर्नमध्ये भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा 42 वा सामना खेळला गेला. सुपर-12 फेरीतील हा शेवटचा सामना होता. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकांत 115 धावांवर गारद झाला. या नंतर आता भारताचे लक्ष उपांत्य फेरीवर (Semi Final) असणार आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडसोबत (IND vs ENG) होणार आहे
भारतीय संघाचा पुढील सामना उपांत्य फेरीत इंग्लंडशी होणार आहे. तो जिंकून भारतीय संघाला पुढील रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान मिळवायचे आहे. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना, भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावून 46 धावा केल्यामुळे चांगली सुरुवात झाली. यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा (15) स्वस्तात निसटला. त्यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसोबत 48 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली, मात्र कोहली (26) विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला.



