
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय वादळ उठले…
मुंबई प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. प्रसाद लाड यांच्याकडून छत्रपतीं बाबत चुकीच्या वक्तव्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं.
प्रसाद लाड यांच्याकडून छत्रपतीं बाबत चुकीच्या वक्तव्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली. शिवसेना राष्ट्रवादीसह (NCP) विविध विरोधी पक्षांनी आमदार लाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नंतर मंगलप्रभात लोढा आणि आता प्रसाद लाड यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सतत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकारण चांगलचं तापलं आहे.
भारतीय जनता पक्षानं (BJP) इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे,अशी बोचरी टीका करत राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे



