vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

महाशिवरात्रीनिमित्त : स्मशानापासून ते कैलासपर्यंत, जाणून घ्या महादेवांशी संबंधित रहस्यांची उत्तरे*

*स्मशानापासून ते कैलासपर्यंत, जाणून घ्या महादेवांशी संबंधित रहस्यांची उत्तरे*

अध्यात्मिक वार्ता महाशिवरात्री निमित्त

देवांचे देव महादेव हे अद्भुत व अविनाशी आहेत. महादेव जेवढे सरळ आहेत तेवढेच ते रहस्यमयसुध्दा आहेत. त्यांचे राहणीमान, निवासस्थान सर्वकाही इतर देवांपेक्षा वेगळे आहे. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात साप धारण करतात, भांग आणि धोतरा ग्रहण करतात असे विविध रहस्य यांच्याशी निगडीत आहेत. महाशिवरात्री च्या निमित्ताने आज आपण महादेवाशी संबंधित काही रोचक गोष्टी आणि यामध्ये दडलेले लाईफ मॅनेजमेंटचे सूत्र जाणून घेऊ.

 

*भगवान शिव यांना स्मशानाचे निवासी का मानले जाते?*

महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते, परंतु तरीही ते स्मशानात निवास करतात. भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात यामागे लाईफ मॅनेजमेंटचे एक गूढ सूत्र दडलेले आहे. हा संसार मोह-मायेचा प्रतिक असून स्मशान वैराग्याचे. महादेव सांगतात की, या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे. कारण हा संसार नश्वर आहे. कधी न कधी हे सर्व नष्ट होणार आहे. यामुळे संसारात राहून कोणताही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैरागीप्रमाणे आचरण करावे.

 

*भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?*

महादेवाला संहाराचे देवता मानण्यात आले आहे. म्हणजेच, जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा संहार करतात. ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते तेच प्रेतयोनी प्राप्त करतात. या सर्वांना महादेव दंडित करतात, कारण शिव संहार देवता आहेत. या कारणामुळे यांना भूत-प्रेतांचा देवता मानले जाते. वास्तवामध्ये जे भूत-प्रेत आहेत ते केवळ एक सूक्ष्म शरीराचे प्रतिक आहेत. महादेवाचा यामागे असा संदेश आहे की, प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करत किंवा त्याला घाबरतात तोसुद्धा महादेवाजवळ पोहोचू शकतो, अट केवळ एवढीच आहे की त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे.

 

*महादेव गळ्यात साप धारण का करतात?*

महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवधेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव असे देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकरण दंश करत नाही. साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की, जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे. यामुळे कधीही हिंसा करू नये.

 

*महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे?*

त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा… तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत… सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.

 

*महादेवाला का प्यावे लागले विष?*

समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले. विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ नावाने प्रसिद्ध झाले. समुद्र मंथनाचा अर्थ आहे, विचारांचे मंथन. मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात, त्यांचे मंथन करून चागले विचार आचरणात आणावेत. आपण जेव्हा आपल्या मनाचे मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील. हेच विष असून हे वाईटाचे प्रतिक आहे. महादेवाने हे आपल्या कंठात धारण केले, त्याचा प्रभाव शरीरावर होऊ दिला नाही. महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देतो की, वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर न होऊ देणे. वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहावे.

 

*महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?*

महादेवाचे वाहन नंदी आहे. बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे. हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे. महादेवसुद्धा परमयोगी, शक्तिशाली आणि परम शांत स्वभावाचे तसेच एवढे भोळे आहेत की यांचे एक नाव भोलेनाथ सर्व जगात प्रसिद्ध आहे. महादेवाने ज्याप्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला होता, त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा कमी नाही. त्याचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते. या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतिक मानले जाते. खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही. हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो. याचा अर्थ आपणही सदैव आपले कर्म करत राहावे. कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे, त्याचप्रकारे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो.

 

*महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे?*

महादेव भालचंद्र नावानेसुद्धा प्रसिद्ध आहेत. भालचंद्रचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा. चंद्राचा स्वभाव शीतल असतो. चंद्राच्या प्रकाश शीतलता प्रदान करतो. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देतात की, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी मन, बुद्धी शांत ठेवून कार्य करावे. बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो.

 

*महादेवाला तीन डोळे का आहेत?*

धर्म ग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत, परंतु महादेवाला तीन डोळे आहेत. तीन डोळे असल्यामुळे यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेवाचा तिसरा डोळा प्रतीकात्मक आहे. डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध करणे. आयुष्यात विविध संकट येत राहतात, जे आपण लवकर ओळखू शकत नाहीत. अशावेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्दर्शककाप्रमाणे आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टीमधील फरक सांगतात. हा विवेक प्रेरणारुपात आपल्यामध्ये असतो. फक्त तो जागृत करण्याची आवश्यकता आहे.

 

*महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात?*

आपल्या धर्मशास्त्रात सर्व देवी-देवता अलंकार, वस्त्र, दागीने यांनी सुसज्जित असे दाखवले गेलेले आहेत. तर, महादेव फक्त मृगचर्म(हरणाचे कातडे)गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात. भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे, कारण महादेवाचे संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असते. संतांचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे. अघोरी, संन्यासी आणि इतर साधू आपल्या शरीरावर भस्म लावून फिरतात. महादेवाच्या भस्म लावण्यामागे वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक कारण आहे. भस्माचा एक विशेष गुण आहे. भस्म शरीरातील रोमांचित करणा-या छिद्रांना बंद करते. भस्म शरीरावर लावल्याने गरमीमध्ये गरमी आणि थंडीमध्ये थंडी जाणवत नाही. भस्म त्वचासंबंधी रोगांमध्ये औषधाचे काम करते. भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की, परिस्थितीनुसार स्वतःला बदलने हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे.

 

*शिवलिंगावर भांग, धोत्रा धोतरा का अर्पण करतात?*

धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला भांग प्रेमी सांगण्यात आले आहे. शिव चरित्रामध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, परंतु त्यामध्ये सामावलेल्या असाधारण संदेशांमुळेच महादेव पूजनीय आहेत. यामध्ये विशेषतः विषपान, बिल्वपत्र, धोत्रा यासारख्या कडवट सामग्री प्रिय असणे यामागे एक शिकवण आहे. वास्तविकतेमध्ये सुखासाठी शक्ती संपन्न होण्यासोबतच परोपकार, त्याग आणि संयम या गोष्टींद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे. याच कारणामुळे शिवलिंगावर भांग, धोत्रा आणि रूईचे फुल यासारख्या विषारी गोष्टी विशेष मंत्राचा उच्चार करून अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. या विशेष मंत्राच्या स्मरणाने अपयश स्वरूपातील दुःख समाप्त होऊन सुख आणि यश प्राप्त होईल.

 

*महादेवाला बेलाचे पान का अर्पण करतात?*

विविध ग्रंथांमध्ये महादेवाला बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तीन पान असलेले एक बिल्वपत्राचा लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून विचार केल्यास, बिल्वपत्राचे तीन पानं चार पुरुषार्थामध्ये तिघांचे प्रतिक आहे – धर्म, अर्थ व काम. हे तिन्ही निस्वार्थ भावनेने महादेवाला समर्पित करणाऱ्या व्यक्तीला चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त होतो.

*हर हर महादेव,श्री शिवाय नम्स्तुभ्यं*

संबंधित पोस्ट

गुरुतत्वाचार

vishwatmaklokswamivarta

आज दुर्गा अष्टमी, नवरात्र उत्सवाची आठवी माळ; जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप

नवीन वर्षात ज्ञानालाच मार्गदर्शक होऊ दे*  *गुरुदेव श्री श्री रविशंकर* 

*तेजस्वी तारा*

vishwatmaklokswamivarta

हनुमान चालीसाचा पठण फायदे

vishwatmaklokswamivarta

महालय श्राद्ध पितृपक्ष 🌹🚩🖤🌹*🙏 तृतीया महालय.12.09.22*

vishwatmaklokswamivarta