समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद
बुलढाणा प्रतिनिधी : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम 8 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत 15 टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या कामासाठी बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या 296 किमी ते 502.752 किमी या दरम्यान गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यांमधून तसेच जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमधून जाणाऱ्या मार्गावर हे काम होणार आहे.
गॅन्ट्री बसविण्याच्या कामादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक सुमारे 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.