
रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मंत्रालय प्रतिनिधी
रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण चांगलेच तापलं आहे. स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला
एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांनी रिफायनरीबाबत आपली भूमिका मांडली. रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी केली.
काय म्हणाले फडणवीस? या रिफायनरीमुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा रिफायनरी प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचे अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
कोकणातील रिफायनरी प्रकल्पामुळे राज्याचा मोठा विकास होणार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. या रिफायनरी प्रकल्पात असणाऱ्या तीन कंपन्यांनी वेगळ्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र, आपण हा प्रकल्प अखंडितपणे राज्यात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हा प्रकल्प एकाच ठिकाणी कोकणात उभा राहत आहे. रिफायनरी विरोधात अपप्रचार सुरू आहे. त्यातून विरोध होत असल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीचे सरकार असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या जागेसाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. आता, त्यांची भूमिका विरोधाची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले



