तंबाखू मुक्तीसाठी दि.१५ पासून विशेष अभियान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर,:- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी युवा पिढी जात आहे. हे वेळीच रोखण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय व सर्व कार्यालयात विशेष अभियान येत्या १५ तारखेपासून राबवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हास्तरीय समन्वय सनियंत्रण समितीचा त्रैमासिक आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, डॉ. किशोर महाले. डॉ. जगदीश वठार, डॉ. मनिषा भोंडळ, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी मनिष दौंड तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान ४३६ व्यक्तिंवर कारवाई करुन ८५ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की. तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन ही भविष्यकाळात तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात ओढते. त्याविरोधात प्रभावी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या दि.१५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सकाळी १० वा. तंबाखुच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. तसेच दि.१६ रोजी सर्व महाविद्यालयात तर दि.१७ रोजी सर्व कार्यालयांमध्ये तंबाखुच्या दुष्परिणामांबाबत माहिती द्यावी. तसेच यासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रमाण वाढवावे. जिल्ह्यात तंबाखुचे सेवन कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करावे,असे निर्देश त्यांनी दिले.०००००