बंजारा समाजाच्या प्रश्नांची जाण अडचणींना दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला
नवी दिल्ली, प्रतिनिधी: बंजारा समाज हा संस्कृती आणि संस्कार जपणारा आहे. माझ्या मतदार संघात या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. या समाजाच्या ज्या देशव्यापी अडचणी आहेत त्या दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी आज येथे संत सेवालाल यांची 286 वी जयंती कार्यक्रमाप्रसंगी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये आज संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. याअंतर्गत संत सेवालाल यांची 286 वी जयंती आणि रूप सिंग महाराज जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री बिरला बोलत होते.
श्री बिरला पुढे म्हणाले, संत सेवालाल यांनी मानवतेसाठी संदेश दिला आहे. भारतीय संस्कृती आणि संत पंरपरेला जगले आणि जगविले. हा समाज मोठया प्रमाणात आधी जंगलात राहायचा. पर्यावरण संवर्धानाचे काम मोठया प्रमाणात या समाजानेच केले आहे. स्वत:च्या गरजा सीमित ठेवून निर्सगाला वाढविण्याचे काम या समाजाने केले आहे. गुरू शिष्य पंरपरा टिकवून हा समाज पुढे जातो असेही श्री बिरला म्हणाले.
राजस्थानमधील कोटा या आपल्या मतदार क्षेत्रात बंजारा समाजाची संख्या मोठी असल्याचे सांगत श्री बिरला म्हणाले, त्यांच्या अडचणींची जाण आहे. बंजारा समाजाची बोलीभाषा, खानपान, वेशभुषा एक समान असूनही वेगवेगळया राज्यात वेगवेगळया वर्ग घटकात हा समाज मोडतो. त्याचा अभ्यास करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तरुण पिढीला शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन करत श्री बिरला पुढे म्हणाले, हा समाज देशभर कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतो, हे या समाजाचे गुण वैशिष्ट्य आहे. श्री बिरला यांनी महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाची लोक पंरपरेवर आधारीत संग्रहालय बनवून त्यांच्या या पंरपरेला जोपासण्याचे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे काम केले असल्याबद्दल कौतुक केले.