
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ प्रकरणे पात्र- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र…
सांगली, प्रतिनिधी-: कुणी दिव्यांग, कुणी घटस्फोटीत, कुणी दुर्धर आजाराने ग्रस्त… प्रत्येकाची व्यथा न्यारी.. रोजचं जगणं परीक्षा घेणारं… अशा वेळी कुणीतरी दुःखावर फुंकर घातली तर भर उन्हात वाऱ्याची झुळुक घेऊन येते. अशा निराधारांचं जीवन सुसह्य करणारा छोटेखानी कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडला. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या पात्र लाभार्थींना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. मंजुरीपत्र मिळाल्यानंतर हक्काचा आधार मिळाल्याची भावना या लाभार्थींच्या चेहऱ्यावर होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, संजय गांधी निराधार योजना तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सुमेधा अभ्यंकर, संदीप पाटील, मकरंद केंगार, सतीश कुंभार, भारत लोटे, दीपाली शिंदे व स्नेहल मुळीक यांच्यासह विविध लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
शासनाने निश्चित केलेल्या १०० दिवसांचा कृती आराखड्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. १०० दिवस कृती आराखड्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र करण्यात आली आहेत. पात्र लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते मंजुरी आदेश वाटप करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना सांगली शहर अध्यक्ष तथा तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संजय गांधी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ५६ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ३९ अशी एकूण ९५ प्रकरणे पात्र करण्यात आली. दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजीच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ६१ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ४२ अशी एकूण १०३ प्रकरणे पात्र करण्यात आली.
माहे मे २०२५ महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, त्याबाबत कोणतीही अडचण आल्यास संजय गांधी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही मध्यस्थी अथवा अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.
00000



