जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..
सांगली, प्रतिनिधी : जलसंपदा विभागामार्फत दि. 15 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविला जात आहे. या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले असून त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पध्दती बदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन बाबत चर्चासत्र आयोजित केले.
वाराणाली विश्रामगृह येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज चे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता सर्वश्री महेश रासनकर, सचिन पवार, अमरसिंह सूर्यवंशी, सचिन नाईक व पाटबंधारे विभागातील अभियंते, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीमंत राठोड यांनी पीक उत्पादकता वाढीसाठी कारणीभूत पाणी कसे, पाणी किती व केंव्हा द्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पाण्याच्या अतीवापरामुळे होणारे नुकसान व उत्पादनात होणारी घट, शेतजमिनीची कमी होणारी पोत याबाबत मार्गदर्शन केले. पाण्याचे नेमके प्रमाण ठरविण्यासाठी उपलब्ध शास्त्रोक्त साधने, विविध ॲप, तंत्रज्ञान यांची माहिती दिली. सिंचनासाठी ठिबकचा वापर कमी पाण्यामध्ये अधिक पीक घेण्यासाठी होऊ शकतो असे सांगून जिल्ह्यातील विविध भागात असणाऱ्या जमिनीची प्रतवारी व त्यानुसार शेतकऱ्यांनी घ्यावयाची पीके याचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्ह्यातील काही भागात खारफुटी चे क्षेत्र वाढले आहे. त्यासाठी सच्छिद्र नलिका वापर करून सब सरफेस ड्रेनेज (sub surface drainage) सुधारणा कार्यक्रम हाती घेणे तसेच या प्रणालीची तांत्रिक माहिती घेऊन योग्य रीतीने अवलंब करणे महत्वाचे ठरते,असे ते यावेळी म्हणाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. टेंभू, ताकारी, म्हैसाळ सारख्या सिंचन योजनांमुळे पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेतकरी ऊस, डाळिंब, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेऊ लागले आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर केला नाही तर जमिनी पाणथळ होऊन मातीचा ऱ्हास उद्भवतो. त्यामुळे सिंचन योजनेचे पाणी कटाक्षाने व नियोजनाने वापरण्याचे आवाहन सर्व अधिकाऱ्यांनी केले.या कार्यक्रमास लाभक्षेत्रातील उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांनी विचारलेल्या सर्व शंकांचे समाधान वक्त्यांनी केले.