अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा पात्र गरजूंना लाभ द्यावा- अध्यक्ष प्यारे जिया खान
सांगली, प्रतिनिधी) : प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याकांसाठी शिक्षण, पायाभूत सुविधा, कौशल्यवृद्धी, रोजगार अशा कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा पात्र व गरजूंना लाभ द्यावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान (मंत्री दर्जा) यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अल्पसंख्याक समुदायासाठी शिक्षणाच्या संधीत वाढ करण्यावशासनाचा भर असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान म्हणाले, अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ द्यावा. कोणतीही तक्रार येऊ देऊ नये. मात्र, शैक्षणिक संस्थांनी शासकीय निधीचा कोणताही गैरवापर करू नये. शिक्षण विभागाने उर्दु शाळांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे त्यांनी सूचित केले.
या बैठकीत अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतला. याअंतर्गत महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, नियोजन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आदिंच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पूरक पोषण आहार वाटप, आरोग्य तपासणी, उर्दु शिकवण्यासाठी अधिक संसाधने, अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण संस्थांसाठी पायाभूत सुविधा, मदरसा आधुनिकीकरण, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, बचतगट, रोजगार प्रशिक्षण आदि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.