जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध ठिकाणी देशी वृक्षरोपांची लागवड**पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रीय पुढाकार घेण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध ठिकाणी देशी वृक्षरोपांची लागवड**पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रीय पुढाकार घेण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन*
नवी मुंबई प्रतिनिधी- आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पर्यावरणपूरक उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आले. या अंतर्गत उद्यान विभागाच्या वतीने 14 ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम नागरिकांच्या उत्साही सहभागातून संपन्न झाले.
यामध्ये वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, उदयान विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि इतर अधिकारी, कर्मचारी तसेच आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी श्रीम. प्रेरणा लांगा व त्यांचे सहकारी त्या सोबतच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षरोपण संपन्न झाले
महानगरपालिकेने यावर्षी 1.25 लक्ष वृक्षारोपणाचे व संवर्धनाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले असून त्यापैकी सीबीडी बेलापूर, पारसिक हिल येथे बेलापूर पाण्याच्या टाकीजवळ आग्रोळी गावाकडून महापौर निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यानजिक डोंगराळ भागात सुरंगी, जांभूळ, मलबेरी, काजू, आवळा, बांबू अशा देशी प्रजातींच्या 250 हून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
अशाच प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 14 ठिकाणी राबविण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्था व वृक्षप्रेमी नागरिक यांचा मोठया प्रमाणावर सहभाग लाभला. त्यासोबतच विविध सोसायट्या, स्वयंसेवी संस्था – मंडळे, महिला बचत गट यांच्या वतीनेही महानगरपालिकेकडून वृक्षरोपे घेऊन वृक्षलागवड करण्यात आली. विशेष म्हणजे पक्ष्यांचा अधिवास वाढून जैवविविधतेत भर पडण्याच्या दृष्टीने प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.
वातावरण बदलाचे परिणाम आपल्याला जाणवत असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड व संवर्धन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोठया प्रमाणात वृक्षलागवड हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या मनातील वृक्षप्रेम वाढीस लागावे याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावर्षी आपण 1.25 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले असून व्यापक लोकसहभागातून ते साध्य होईल असा विश्वास व्यक्त करीत आयुक्तांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत विनामूल्य देण्यात येणारी वृक्षरोपे घेऊन नागरिकांनी ती योग्य ठिकाणी लावावीत व त्याची जपणूक करावी असे आवाहन केले आहे.