पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी
पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जालना । प्रतिनिधी – आस्था हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी सर्वच पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना व पत्रकारांच्यावतीने निषेध करण्यात आला असून शुक्रवार (दि 27) रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची भेट घेत त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देत त्या डॉक्टरांची डिग्री रद्द करण्यात येऊन त्यांची प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी केली आहे. श्री महाडीक यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून कारवाईचे आश्वासन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आस्था हॉस्पीटल, राजुर रोड कॉर्नर, भोकरदन नाका जालना, येथील प्रशासनातील डॉक्टरांची पत्रकारांबद्दल हीन भावना आहे. या संदर्भातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला असून दै. जगाचा जगमित्र, दै. गजकेसरी नायक, दै. युवा आदर्श, दै. सत्यवार्ता समाचार यासह विविध वृत्तपत्रांत युट्युबवर वृत्त – व्हिडीओ प्रकाशित झालेले आहेत. यात आस्था हॉस्पीटलचे डॉक्टर हे बोलतांना म्हटले आहे की, पत्रकार म्हणून पहिले सांगितले असते तर रुग्णास अॅडमिट करुन घेतले नसते, पत्रकारांचा मुड चेंज होतो, आम्ही पत्रकारांना अॅडमिट करून घेत नाही. असे म्हणत हात जोडत पत्रकारांपासून दूर राहतो असल्याचे म्हटले आहे. आस्था हॉस्पीटलच्या डॉक्टरांचे असे वागणे डॉक्टरी पेशाला शोभत नाही. त्यांनी एखाद्या विशिष्ट समुहाचा द्वेष करणे योग्य नाही. पत्रकारांचा या डॉक्टरांना द्वेष असल्याचे व्हिडीओवरून स्पष्ट होते. अशा डॉक्टरांची मानसिकता पाहता डॉक्टर हे इतर जात-धर्म-समुहाचाही द्वेष करतात याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी रुग्णांचा उपचार योग्य प्रकारे होणार नाही. शिवाय ज्या मृत रुग्णाच्या नातेवाईकास हे डॉक्टर बोलत आहे. त्या मृत व्यक्तीच्या मृत्यूची नेमकी कारणे शोधून यात डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे की कसे हे तपासणे ही आवश्यक आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदार वागण्यामुळे आस्था हॉस्पीटलमधील सर्वच डॉक्टरांची डिग्री रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी.
शिवाय योजनेसंदर्भातही बोलतांना डॉक्टर म्हणतात की, केवळ पन्नास हजार रुपये योजनेतून मिळणार आहे. आणि ते देखील तीन महिन्यांनंतर मिळतात. आम्ही आपल्याला मदत म्हणून हे करतोय. याचा विचार करता योजनेत शासन एखाद्या आजाराचा अर्धवट खर्च देते का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आस्था हॉस्पीटल प्रशासनाने एकप्रकारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची खोटे बोलून आर्थिक लुट करत असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे आस्था हॉस्पीटलमधील सर्व प्रकारच्या शासकीय योजना तात्काळ बंद करण्यात याव्यात अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे
डॉक्टरांची मानसिकता, बेजबाबदारपणा आणि त्यांची एकंदरीत वागणूक पाहता त्यांची डिग्री रद्द करून त्यांची प्रॅक्टीस बंद करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावी. जेणे करून भविष्यात केवळ पत्रकारच नव्हे तर कोणत्याही जात-धर्म-समुहाचा द्वेष ठेवणार्या डॉक्टरांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वित्त, जीवीत अथवा ईतर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून येत्या पंधरा दिवसांत कारवाई करण्यात यावी. अन्यथा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा ईशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला.
निवेदऩावर प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, शहराध्यक्ष सुहास वैद्य यांच्यासह शेख ईलियास अब्बास, आमेर खान, संदीप भाकरे, शेख शकील, सुनील भारती, चेतन साबळे, नरेंद्र जोगड, सुनील नरवडे, तरंग कांबळे, बळीराम राऊत, आनंद शिंदे यांच्यासह पत्रकारांच्या स्वाक्षर्या आहेत.