पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद..
राज्य प्रतिनिधी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद..
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.
हे याचे देखील द्योतक आहे की अधिकाधिक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात योगसाधना करत आहेत. यावेळी आपण ‘योग दिनाची’ कितीतरी आकर्षक छायाचित्रे पाहिली आहेत. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी तीन लाख लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला. विशाखापट्टणम इथूनच आणखी एक अद्भुत दृश्य समोर आलं आहे. दोन हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 मिनिटांमध्ये 108 सूर्यनमस्कार घातले. विचार करा, किती शिस्तीचं पालन आणि समर्पण असेल. आपल्या नौदलाच्या जहाजांवर देखील योगाभ्यासाची भव्य झलक पहायला मिळाली. तेलंगणामध्ये तीन हजार दिव्यांग मित्र एकत्रितपणे योग शिबिरात सहभागी झाले. त्यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे योग सशक्तीकरणाचे देखील माध्यम आहे. दिल्लीच्या लोकांनी योगला स्वच्छ यमुनेच्या संकल्पाशी जोडलं आणि यमुना किनारी जाऊन योगसाधना केली. जम्मू-काश्मीरमधला चिनाब पूल, जो जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे, तिथे देखील लोकांनी योगाभ्यास केला. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि ‘आयटीबीपी’चे जवान, तिथे देखील त्यांनी योगाभ्यास केला, साहस आणि साधना एकत्र पाहायला मिळाले. गुजरातच्या लोकांनी देखील एक नवीन इतिहास रचला. वडनगर मध्ये 2121 (दोन हजार एकशे एकवीस) लोकांनी एकाच वेळी भुजंगासन केलं आणि नवीन विक्रम बनवला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस जगातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमधील योगदिनाची छायाचित्र समोर आली आहेत आणि प्रत्येक छायाचित्रात एक गोष्ट खास राहिली आहे, शांतता, स्थैर्य आणि संतुलन. या वर्षाची संकल्पना अतिशय खास होती, Yoga for One Earth, One Health, म्हणजे “एक पृथ्वी एक आरोग्य”. ही केवळ एक घोषणा नाही तर एक दिशा आहे जी आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकएम्’ची जाणीव करून देते. मला विश्वास आहे, यावर्षीची योग दिनाची भव्यता जास्तीत जास्त लोकांना योग साधनेचा अवलंब करण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.
माझ्या प्रिय देशबांधवानो,जेव्हा कुणी तीर्थयात्रेसाठी निघतं, तेव्हा एकच भावना सर्वप्रथम मनात येते, ‘चलो बुलावा आया है’. हीच भावना आपल्या धार्मिक यात्रांचा आत्मा आहे. या यात्रा शरीराची शिस्त, मनाची शुद्धी, एकमेकांप्रती प्रेम आणि बंधुत्व, ईश्वराशी जोडले जाण्याचं माध्यम आहे. त्याशिवाय या तीर्थयात्रांची आणखी एक बाजू असते. या धार्मिक यात्रा सेवेच्या संधींचे एक महाअनुष्ठान देखील असतात. जेव्हा कुठलीही यात्रा असते, तेव्हा जितके लोक यात्रेसाठी जातात त्याहून अधिक लोक यात्रेकरूंच्या सेवेच्या कामात सहभागी होतात. ठिकठिकाणी भंडारे आणि लंगर लावले जातात. लोक रस्त्याच्या कडेला ‘प्याऊ’ बसवतात. सेवा भावनेनेच वैद्यकीय शिबीरे आणि सुविधांची व्यवस्था केली जाते. कितीतरी लोक स्वखर्चाने यात्रेकरूंसाठी धर्मशाळांची आणि राहण्याची व्यवस्था करतात.
मित्रांनो,प्रदीर्घ काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर म्हणजेच भगवान शिव यांचं धाम. हिंदू, बौद्ध, जैन प्रत्येक परंपरेत कैलास हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानलं गेलं आहे. मित्रांनो, तीन जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि पवित्र श्रावण महिना देखील काही दिवसांवर आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण भगवान जगन्नाथ जी यांची रथयात्रा देखील पाहिली. ओदिशा असेल, गुजरात असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपरा असेल, लाखो श्रद्धाळू या यात्रांमध्ये सहभागी होतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ भावनेचे प्रतिबिंब आहेत. जेव्हा आपण श्रद्धा भावनेनं, पूर्ण समर्पणानं आणि शिस्तबद्धतेनं आपल्या धार्मिक यात्रा पार पाडतो तेव्हा त्याचं फळ देखील मिळतं. यात्रेला जाणाऱ्या सर्व सौभाग्यशाली श्रद्धाळूंना मी माझ्या शुभेच्छा देतो. जे लोक सेवाभावनेनं या यात्रा यशस्वी आणि सुरक्षित बनवण्यासाठी झटत आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो.