
चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन
जालना, प्रतिनिधी: कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते आज जालना तालूक्यातील जामवाडी येथील शासकीय गायरान जमिन असलेल्या 2 एकर क्षेत्रावर चारा लागवडीच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रशांत चौधरी, जिपच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, तहसीलदार छाया पवार, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) सुरेश वडोदे, गट विकास अधिकारी संदीप पवार, तालुका कृषी अधिकारी विष्णु राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. भिसे, जामवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर वाडेकर यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील म्हणाले की, गायरान जमिनीवर चारा लागवड करुन, शेतकरी कुटूंबांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शाश्वत अर्थिक उत्पन्नासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक कुटूंबाकडे चारा लागवडीसाठी स्वत:ची जमीन नसल्यामुळे शासनामार्फत गायरान जमिनीवर चारा लागवड करून त्यांना मदत करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्यासाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. तसेच रोजगार निर्मिती, कार्बन क्रेडिट निर्माण, जमिनीची सुपीकता वाढविणे यासारखे अनेक फायदे होणार आहेत. यावेळी कृषी विभागास चारा लागवड क्षेत्रास तार कुंपण करण्याच्या व वन विभाग प्रादेशिक जालना यांना लागवडीच्या बाजूने सलग समतल चर करण्यात यावी. तसेच पाऊस कमी पडल्यास या क्षेत्रास पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी ॲङ हेलोंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेत. चारा लागावडीकरीता त्यांना प्रोत्साहित केले.
-*-*-*-*-*-*-*-



