रायगड प्रतिनिधी:- खरीप हंगाम 2025-26 मधील राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील यांच्याहस्ते काल नियोजन भवन येथे करण्यात आले.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे, उप व्यवस्थापक मुंबई भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई सौ. शिल्पी मिश्रा, जिल्हा प्रतिनिधी रायगड पुरुषोत्तम सरनाईक, अलिबाग तालुका प्रतिनिधी राहुल लांडगे आदि उपस्थित होते.
पीक पेरणीपासून ते काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक किड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी करणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाच्या विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसानभरपाई मिळणार आहे. यावर्षी राज्य शासनातर्फे पीकविमा योजनेमध्ये अत्यंत चांगले बदल करण्यात आले असून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. पिकविमा योजनेबद्दल शेतकऱ्यांचे असलेले गैरसमज दूर करण्यामध्ये सगळ्यांनी आपले योगदान द्यावे. तसेच पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घ्यावा, असे अहवान यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.