विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे.
– कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
सांगली, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही सोडू नये. ज्ञानी व्यक्तीच्या आयुष्याचा आलेख हा कायम चढता राहतो. त्यामुळे चांगली संगत धरणे, शिक्षकांचे व आई वडिलांचे नाव मोठे करणे हे विद्यार्थ्यांचे प्रथम ध्येय असायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले.
कायदेविषयक जनजागृतीसाठी आयोजित रॅलीनंतर शे. र. वि. गो. सर्वोदय विद्यालय सांगली येथे आयोजित कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अशासकीय सदस्य विजय कोगनोळे, मुख्याध्यापिका श्रीमती एस. जी. म्हेतर, सहशिक्षक संजय पवार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी बालकांचे कायदे, बालमजुरी, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व व्यसन करणाऱ्या लोकांपासून लांब रहावे, जेणेकरून आपले आरोग्य व मानसिक स्थिती चांगली कशी करता येईल, याचे उदाहरण त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात आलेल्या अनुभवातून दिलेसचिव गि. ग. कांबळे यांनी सर्वोदय विद्यालय, सांगली येथे रॅलीस हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तिथून ही रॅली रेल्वे स्टेशन सांगली, कुपवाड रोड हळद कारखाना या मार्गे पुन्हा सर्वोदय हायस्कूल सांगली येथे येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये विद्यालयातील एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रॅलीचा उद्देश कायदेविषयक जनजागृती जनसामान्यापर्यंत पोहोचवणे हा होता. या रॅलीमध्ये कायदेविषयक जनजागृतीचे नारे व घोषणा देण्यात आल्या.
स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती एस. जी. म्हेतर यांनी केले. प्रास्ताविक संजय पवार यांनी केले. कार्यकमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक, शंकरराव वानखडे, संतोष खंदारे, नितीन आंबेकर व इतर कर्मचारी तसेच सर्वोदय विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी केले.