राळेगणसिद्धी l डॉ.अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राज्य ट्रक,टेम्पो,टँकर,बस वाहतूक महासंघाचा महामेळावा संपन्न,
राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर आणि बस वाहतूक महासंघाचा राज्यस्तरीय महामेळावा राळेगणसिद्धी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे यांनी भूषवले होते. कायदेतज्ज्ञ प्रसाद लकेश्री व सुरेंद्र लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
महामेळाव्याला राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील ट्रक, टेम्पो, टँकर व बस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र सकपाळ, सरचिटणीस भगवान महाराज आव्हाड, उपाध्यक्ष शंकरराव चिंचकर दादा, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, उपाध्यक्ष (बस विभाग) संजय झुरळे, सचिव प्रकाश माने, सचिव संभाजी पाटील, सचिव बटेसिंग राजपूत आदींसह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
अण्णा हजारे यांनी मेळाव्यात वाहतूकदारांच्या समस्या व अडचणी यांविषयी सविस्तर संवाद साधला. सध्याच्या व्यवस्थेमध्ये वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत त्यांनी सखोल माहिती घेतली. अण्णांनी सांगितले की, “वाहतूकदार समाज हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा आहे. त्यांच्या समस्या आणि अडचणी दूर होणं गरजेचं आहे. मी या संदर्भात प्रयत्नशील राहील.” त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले.
या महामेळाव्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्यात वाहतूकदारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये इंधन दरवाढ, टोलमाफी, अनावश्यक पोलिसी दंडात्मक कारवाई, विमा दरवाढ यांसारख्या ज्वलंत प्रश्नांचा समावेश होता. महासंघाने या सर्व मागण्यांचे निवेदन लवकरच शासनाकडे देण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा महामेळावा वाहतूकदारांच्या संघटनबळाचे प्रतीक ठरला असून, भविष्यात वाहतूकदारांचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी ही चळवळ अधिक सशक्त होईल, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.