जालना । प्रतिनिधी – एकीकडे जालना महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण मोहीम वेगाने सुरू आहे. शहरातील रस्ते मोकळे करण्यात येत आहेत आणि विकास आराखड्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाच, दहा, बारा मीटरपर्यंतची अनेक बांधकामे निष्कासित केली जात आहेत. मात्र दुसरीकडे, शहरातील काही प्रतिष्ठित व्यापारी रीतसर बांधकाम परवानगी घेऊनही परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करून रस्ते लहान करत असल्याचे चित्र सध्या जालना शहरात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, जालना शहरात अनधिकृत बांधकांवर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
शहरातील मंगळ बाजार भागात बांधकाम परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांनी बांधकामस्थळी जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला. या तपासणी अहवालावरून वंदना जगदीश प्रिथ्यानी, जगदीश केवलराम प्रिथ्यानी, अनिकेत जगदीश प्रिथ्यानी यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम निरीक्षक भाऊलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून रविवार (दि 3) रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शाकील हुसेन शेख (रा. गांधीनगर, जालना) यांनी 24 मार्च 2025 रोजी महानगरपालिका कार्यालय, जालना येथे निवेदनाद्वारे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने व कार्यालयीन आदेश क्र. जा. ज. न. प्र./नविप/2025/356 दिनांक 23.05.2025 नुसार प्रत्यक्ष स्थळपाहणी निरीक्षक अशोक के. लोंढे, काद्राबाद यांनी जायमोक्यावर जाऊन तपासणी केली होती.
तपासणी अहवालानुसार, न.भू.क्र. 4404, 4405, 4406 या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळले आहे. बांधकामाचे तपशील पुढील प्रमाणे आहे यात पुढील बॉर्डर: 4.60 मी. द 5.40 मी., मागील बाजू: 4.12 मी. द 47.85 मी., पूर्व बॉर्डर: 1.89 मी. द 22.25 मी., पश्चिम बॉर्डर: 4.59 मी. द 22.25 मी. समावेश आहे.
तसेच 28.35 मी. द 8.53 मी. या क्षेत्रफळामध्ये अनधिकृत स्लॅब टाकून तसेच सामासिक अंतरामध्ये बांधकाम परवानगीपेक्षा जास्त बांधकाम, विटा सिमेंट रेती खडी सर्व्हिस मध्ये बांधकाम परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी अहवालानुसार, त्यांनी अतिरिक्त जागेतही बांधकाम केले आहे व त्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भाऊलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध कलम 223 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे रविवार (दि 3) रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे जालन्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि यावर पोलीस तसेच प्रशासनाकडून पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.