पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …
मुंबई प्रतिनिधी-
मागील 48 तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आणि प्रामुख्यानं समुद्रकिनारी भागांना पावसानं झोडपलं असून, पुढच्या 24 तासांसाठीसुद्धा या भागांसाठी अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीचाही यामध्ये समावेश असून, आता पालघर जिल्ह्यातून चिंतेत भर टाकणारं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
उपलब्ध माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत. तर, वसईतील 3 बोटींशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळं स्थानिक मासेमारांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
पालघर जिल्यातील सातपाटी बंदरातील 4 बोटी आणि खोचिवडे येथील 2 बोटींनी गुजरातच्या जाफराबाद मधील नवा बंदरात घेतला आसरा घेतल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एकूण 19 बोटी समुद्रात अडकल्या होत्या. यामधील 13 बोटी वसई, 2 खोचिवडे तर 4 सातपाटी बंदरातील बोटी होत्या. वसई बंदरातील 13 बोटिंपैकी बोटी 10 बोटी वसई बंदरात रात्री उशिरा परातल्या. मात्र 3 बोटी अद्याप बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.
खवळलेल्या समुद्रानं धडकी भरतेय…
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मागील 48 तासांपासून समुद्र खवळलेल्या असून, भरतीच्या वेळी उंचच उंच लाटाही उसळत आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 65 किमी इतका असल्यानं अद्यापही समुद्रात असणाऱ्या बोटिंसाठी अनेक अडचणी उभ्या राहताना दिसत आहेत. प्रशासनाकडून तीन दिवसांपूर्वीच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परतण्याच्या दिल्या होत्या, मात्र असं असतानाही काही बोटींनी किनारा न गाठल्यानं आता हे संकट आणखी गंभीर होतना दिसत आहे.