घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी
जालना (प्रतिनिधी) : जालना शहराला शाश्वत पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगेबाबा घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाचे अध्यक्ष व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ञ सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे.
डॉ. लाखेपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दशकांपासून नॅचरल ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून (विद्युत खर्चाविना) जालना शहराला तहान भागवणारा हा तलाव गेल्या काही वर्षांत सतत दुर्लक्षित राहिला आहे. गोदावरी-पैठण-अंबड-जालना या महागड्या वीजेवर चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनेनंतर या तलावाकडे प्रशासनाने डोळेझाक केली. परिणामी तलाव गाळाने भरला आहे, अतिक्रमण वाढले आहे आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे तलावाचा सांडवा पूर्णतः जिर्णावस्थेत असून फुटण्याच्या धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.
गेल्या आठवडाभरात या संदर्भातील बातम्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रसिद्ध झाल्या आहेत. तरीसुद्धा नगरपरिषद व जलसंपदा विभाग यांच्यातील “मालकी हक्क” वादामुळे आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामे रखडली आहेत. वर्षानुवर्षे या जबाबदारीची ‘फुटबॉल’ खेळली जात आहे.
सद्यस्थितीत, या कामासाठी आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नुकतीच जिल्हा नियोजन समिती च्या एकुण निधी पैकी५% निधी आपत्कालीन कामांसाठी वापरण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना दिला आहे. या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी तातडीने सांडव्याच्या दुरुस्तीला निधी मंजूर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
डॉ. लाखेपाटील पुढे म्हणाले की, घाणेवाडी तलाव हा जालना शहराच्या अस्तित्वाशी निगडित आहे. पावसाळ्याच्या काळात सांडवा फुटल्यास प्रचंड आपत्ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेऊन सांडव्याची दुरुस्ती करावी तसेच गाळ काढणे, अतिक्रमण हटविणे आणि साठवण क्षमता वाढविण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत.
या निवेदनामुळे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, जालना शहरवासीय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीची सकारात्मक कारवाई होण्याची अपेक्षा करत आहेत