जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण
रायगड, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर एकूण १ हजार ३९० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत आस्थापना विषयक विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांची बिंदुनामावली तयार करून कोकणभवन येथून तपासून घेण्यात आली असून आवश्यक दुरुस्त्या करून ती प्रमाणित करण्यात आली आहे. तसेच दोन्ही संवर्गातील अंतिम जेष्ठता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१ हजार ३७१ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी iGot पोर्टलवर १ हजार ३१९ जणांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून त्यापैकी ४८४ कर्मचाऱ्यांनी ५ कोर्सेस पूर्ण केले आहेत. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत १७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला असून ६१ जणांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याच कालावधीत ११ कर्मचाऱ्यांना शिपाई संवर्गातून महसूल सहायक संवर्गात तर आणखी ११ कर्मचाऱ्यांना ग्राम महसूल अधिकारी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.
मागील वर्षी राज्य शासनाच्या नियुक्त्यांतर्गत जिल्ह्यात २१६ उमेदवारांना ग्राम महसूल अधिकारी, १८ उमेदवारांना महसूल सहायक तसेच पुरवठा विभागात ४१ उमेदवारांना महसूल सहायक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. गट क व ड संवर्गातील २५ मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देण्यात आली असून प्रतिक्षा यादीतील बहुतांश उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.याशिवाय जिल्ह्यातील कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे सेवा अभिलेख डिजिटल करण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात अंतर्भूत असलेल्या आस्थापना विषयक सर्व बाबींचे १०० टक्के कामकाज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्ण केल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.