श्रीगणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबईत 3 सप्टेंबरला भव्यतम ‘कलागणेश महोत्सव’
नवी मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन निणर्यानुसार गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत व त्यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत आहे.
या दृष्टीने पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करतांनाच पर्यावरण विषयक जाणीव जागृती करणारे देखावे उभारणा-या व पर्यावरणपूरक साहित्याचा सजावटीमध्ये वापर करणा-या गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे व पर्यावरणाची जपणूक व्हावी याकरीता ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेश दर्शन स्पर्धा 2025’ आयोजित करण्यात आली आहे.
या सोबतच 64 कलांचा अधिपती मानल्या जाणा-या श्रीगणरायाचा उत्सव हा कला व संस्कृतीने संपन्न असावा यादृष्टीने बुधवार दि.03 सप्टेंबर 2025 रोजी, सायं. 4.00 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह या ठिकाणी ‘कलागणेश महोत्सव’ हा भव्यतम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये ‘सारेगमप संगीत स्पर्धा’ विजेते सुप्रसिध्द गायक श्री. प्रथमेश लघाटे आणि श्रीम. मुग्धा वैशंपायन यांचा श्रीगणेश भक्तीगीतांचा सुरेल वाद्यवृंद आयोजित केला आहे. त्यासोबतच स्थानिक विद्यार्थी, युवक व महिला यांच्या नृत्याविष्काराचाही समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे रंगमंचावर स्वराविष्कार सादर होताना श्रीगणेशाची प्रत्यक्ष मूर्ती साकारली जाणार आहे तसेच अक्षरांतून श्रीगणेशाची चित्राकृती रेखाटली जाणार आहे.
तसेच या महोत्सवामध्ये ‘अक्षर गणेश’ हे कलाकृतीचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन आणि इतर कलात्मक साहित्याचे स्टॉल लावले जाणार आहेत. श्रीगणरायाची विविध कलाविष्कारांमधून आराधना करणा-या या विशेष कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई क्षेत्रातील विविध क्षेत्रात कार्यरत संस्था, मान्यवर व्यक्ती, नागरिक यांच्याशी सुसंवाद वाढीवर भर देण्यात येत असून हा कार्यक्रम हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
तरी दि. 03 सप्टेंबर 2025 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे सायं. 4.00 वाजता आयोजित ‘कलागणेश महोत्सव’ मध्ये प्रवेश विनामूल्य असून याची नोंद घेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा आनंद वाढवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.