
गावाच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबबावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे- अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन
राज्य प्रतिनिधी- सांगली,: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावातल्या ग्रामस्थ, सरपंच आणि गावाच्या समृध्दीचे अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून एक चळवळ उभी करावी. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गाव विकासाचे आदर्श केंद्र बनेल, यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल इनाम धामणी येथे आयोजित या कार्यशाळेस आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे राज्याचे प्रशिक्षण शिबिर पार पडले असून, तालुक्या – तालुक्यामध्ये प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत, जिल्ह्याचे प्रशिक्षण शिबिर आज येथे होत आहे. या शिबिरासाठी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्यांनी भाग घेतला आहे. 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरवात होत असून, या अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. या कार्यक्रमासाठी ग्रामसभेची सगळी गावे ऑनलाईन प्रणालीने जोडण्यात येणार असून सगळ्या गावांमध्ये किमान 400 लोकांची ग्रामसभा झाली पाहिजे, अशा पध्दतीने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले,
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, या अभियानाबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता असून, गावच्या सरपंचामध्ये प्रचंड ताकद असून, त्याने गावाची प्रगती करायचे ठरवले तर सर्वांचे हात पुढे येतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थांच्या एकीने सगळ्यांनी ठरवलं तर हे अभियान नक्कीच यशस्वी होईल, असे ते म्हणाले.ग्रामविकासासाठी संत गाडगेबाबा अभियान, हागणदारीमुक्त अभियान, तंटामुक्त अभियान आदि अभियाने माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकालात झाली. ही सगळी अभियाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात एकत्र आली आहेत. गावातील प्रत्येक घटकासाठी शासनाची योजना आहे. जर शासनाच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी केली तर गावातील 65 टक्के काम संपते. त्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्वांना आपल्या गावासाठी या अभियानामध्ये सहभागी करुन घेण्याची भूमिका सरपंचांनी घ्यावी. ग्रामसभेला गावातील मंडळे, स्वयंसेवी संस्था, बचत गट यांना बोलवावे. सगळ्यांनी मिळून हे अभियान पुढे घेवून जावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000



