अध्यात्मिक वार्ता-उपवास ह्याचा अर्थः ‘ उप ‘ म्हणजे जवळ, ‘ वास ‘ म्हणजे रहाणे. भगवंताच्या जवळ रहाणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्त्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे. नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्याव्यक्तीकडे येतात, तिने ते उपवास करावेत म्हणजेच त्या कुटूंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहीजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध रहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण रहावी हा उद्देश आहे. ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून, खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते. शरीर लवकर थकते. पोटात गेल्याबरोबर निद्रा येते. मग उपवास, आराधना होत नाही. म्हणून हलके, भाजके अन्न, दुध व फलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत जांभया, आळस येत राहतो. बर्याच
बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात. पण तांबूल रजोगुणी आहे. सत्त्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये. शरद ऋतुत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते. निसर्गात अनेक जिव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात. असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्त्विक आहाराचे सेवन रोगांचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते. ‘ जीवेत शरदः शतम | ‘ म्हणजे आपण शंभर शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली असते.
५} व्रताचे नियम जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केशकर्तन करू नये. गादीवर झोपू नये. दुसर्याच्या घरी अंथरूणावर झोपू नये अथवा बसूही नये. पायात चप्पल घालू नये.
पण आजकाल हे शक्य होत नाही. मनशांत ठेवावे. परान्न घेवू नये. उगाच चिडचिड करू नये. व्रत करतानाच ते समजावून घेवून करावे. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे. स्वत:ला काय झेपणार आहे हे पहावे म्हणजे थोडक्यात स्वतःच्य शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडतेय असे आहे तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे, त्याला सतत
प्रार्थना करावी, ‘ हे देवा, हे माझ्याकडून करवून घे ‘ व्रताचा अर्थ समजावून घेवून व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही. ” हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे. ” अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच होते. नवरात्रात जर सूतक आले किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसर्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौच
आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नेवेद्य दुसर्याकडून दाखवून घेवून त्याचे लगेचच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नेवेद्य दाखवु नये. कुमारीपूजा : नवरात्रात कुमारीपूजा हा महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज एक प्रमाणे नऊ दिवस कुमारीकांची पूजा असते. न जमल्यास एक दिवस तरी कुमारीका पूजन करावे. दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीला ‘ कुमारीका ‘ म्हणतात. दहावर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरूवात करतो, म्हणून दहाव्या वर्षानंतर कुमारीका नाही. दोन वर्षाची ‘ कुमारी ‘, तीन वर्षाची ‘ त्रिमूर्ती ‘, चार वर्षाची ‘ कल्याणी ‘, पाच वर्षाची ‘ रोहिणी ‘, सहा वर्षांची ‘ कालिका ‘, सात वर्षांची ‘ चंडिका ‘, आठ वर्षांची ‘ शांभवी ‘, नऊ वर्षांची ‘ दुर्गा ‘, व दहा वर्षांची ‘ सुभद्रा ‘ अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेवून तिला आवाहन करावे व तिची पूजा करावी.