आज मुंबईत भाऊबीजेनिमित्ताने धावणार बीइएसटी च्या अतिरिक्त बसेस..
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी खुशखबर. भाऊबीजनिमित्ताने नातेवाईकांची भेट घेणाऱ्या भावा बहिणींचा प्रवास बेस्टने सुकर केला आहे. मुंबईतील परिवहन सेवा म्हणजेच बेस्टने २३ ऑक्टोबरला भाऊबीज सणाला लक्षात घेऊन संपूर्ण मुंबई शहर, उपनगर तसेच नवी मुंबईमध्ये एकशे चौतीस अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या वाढीव बसचा हेतू म्हणजे सणाच्या काळात प्रवासी संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन गर्दी कमी करणे आणि प्रवाशांना अधिक सोयीची, सुलभ वाहतूक सुविधा पुरवणे. या एकशे चौतीस वाढीव बसेसची वाहतूक विविध भागांत वाढवण्यात आली आहे. मीरा रोड, भाईंदर अशा परिसरांसह ठाणे भागातही या सेवा वाढवण्यात आल्या आहेत.नवी मुंबईमध्ये देखील बस सेवेचा विस्तार करण्यात आला असून कोपरखैरणे, एरोली, घणसोळी, सीबीडी बेलापूर यांसारख्या भागात अतिरिक्त बस सोडल्या आहेत.
भाऊबीज दिवसाच्या निमित्ताने नातेवाईकांच्या भेटी, सणासुदीचे कार्यक्रम आणि प्रवासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक वरचा ताण अधिक असतो. त्यामुळे बेस्टने त्या वाढत्या प्रवासी ओढीसाठी आधीच सज्जता घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एकंदर प्रवासाचा अनुभव सुधारावा, स्थानिक बस सेवा पुरेशी उपलब्ध असवी, पुरेशा बस मार्गांनी प्रवाशांची गर्दी नियंत्रित करता यावी, हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासोबतच बस स्थानकांवर, मुख्य बस थांब्यांवर बेस्ट निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी तैनात ठेवले जातील. ते प्रवाशांना मदत करतील आणि गर्दीचे व्यवस्थापन करतील.
बेस्टसोबतच दिवाळीनिमित्ताने महाराष्ट्र परिवहनने देखील ज्यादा बस सोडल्या होत्या. यामुळे प्रवाशांना फायदा होऊन त्यांचा प्रवास अधिक सुकर आणि सुखकर झाला. आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून प्रवाश्यांना त्यांच्या गावी योग्य वेळेत पोहचता आहे. या धर्तीवर बेस्टने देखील भाऊ बीजनिमित्ताने या उपक्रमाची आखणी केली आहे.