
देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूतीभारत माता स्तुतीच्या गौरव दिनानिमित्त वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन..
अमरावती, प्रतिनिधी) : ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताच्या 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज सामुदायिक वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार विजय लोखंडे, निलेश खटके, तसेच विविध कार्यालयांचे प्रमुख, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान यांची अनुभूती सर्वांना यावेळी आली.
स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी क्रांतीची जाज्वल्य ज्योत आपल्या गीतातून सबंध देशभर पेटवली. ‘वंदे मातरम्’ या गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित येथील संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर हजारो विद्यार्थी, तरुणांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न झाला. यावेळी मुलांनी देशभक्तीपर लघू नाटिका सादर केली, तर मुलींनी लेझीम पथक सादर केले.
खासदार डॉ. अनिल बोंडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक अनंत सोमकुवर, प्राचार्य अनिल बोरकर, प्राचार्य राजेश शेळके, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्त्या पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, भगिनी निवेदिता मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रहाटगाव येथील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. निदेशक प्रकाश गंडोधर यांनी सूत्रसंचालन केले.
00000



