मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग
सांगली, प्रतिनिधी) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम 1 (ब) रहदारी अधिकारान्वये सुधारित वाहतूक नियोजन जाहिरनामा कायमस्वरूपी प्रसिध्द केला आहे. यानुसार मिरजेतील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक व दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे.
मिरज शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्यालगत ज्युबिली कन्या शाळा व इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने त्याचबरोबर दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता तांदूळ मार्केट, महानगरपालिका कार्यालय, तलाठी कार्यालय असल्याने एस.टी. बसेस व जड वाहने नमूद रोडवरुन ये-जा करी असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होते.
शहरातील वाहतूक सुरळीतपणे विना अपघात चालू रहावी यासाठी मिरज शहरातील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी तसेच दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक जाणारा रस्ता एकेरी वाहतुक (वन वे) आवश्यक आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातास आळा बसेल. तसेच वाहतूक सुरळीत चालू राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणार नाही. सदर भागातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या इंधनाचा वेळेचा अपव्यय होणार नाही. सदर भागातील मागणीनुसार खालीलप्रमाणे एकेरी वाहतूक मार्ग (वन वे) करण्यात आला आहे.
एकेरी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे – फुलारी कॉर्नर ते दत्त चौक – फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी (वन वे) करण्यात आला आहे. दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल.
दत्त चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौकातून दत्त चौकाकडे दुचाकी वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनचालक यांना महाराणा प्रताप चौकातून डावीकडे उत्तरेस वळण घेऊन फुलारी कॉर्नर मार्गे दत्त चौक व गाडवे चौकाकडे जाता येईल. सदरचा जाहिरनामा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पासून कायमस्वरुपी करण्यात आला असून, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.