
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात तीन दिवसांत 40 गुन्हे दाखल.
मुंबई प्रतिनिधी : जन आशीर्वाद यात्रा: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील तीन दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी 40 गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये, गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस मुंबई आणि उपनगरात विविध ठिकाणी गेलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी, आग्रीपाडा, सहार विमानतळ, काळाचौकी, शीव, आझाद मैदान, गावदेवी, मुलुंड, पवई, एमआयडीसी, मेघवाडी, गोरेगाव, चारकोप, बोरीवली आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 40 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.



