
मुंबईत आणखी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल,फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खबऱ्यांकडून १७ लाख रुपये पोलिस अधिकाऱ्यांनी उकळल्याचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील आणखी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खबऱ्यांकडून १७ लाख रुपये पोलिस अधिकाऱ्यांनी उकळल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदार प्रॉपर्टी डिलर असून त्यांच्याकडे पोलिस अधिकारी वारंवार पैशांची मागणी करत होते. तक्रारदाराने पैसे न दिल्याने त्याला एका गुन्ह्यात गोवत एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला, असा आरोप तक्रारदाराचा आहे. हा गुन्हा पुढे तपासासाठी गुन्हे शाखा १० कडे वर्ग केला होता. इतक्यावरच न थांबता पोलिसांनी आरोपीला मारहाण करत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केली आहे. या तक्रारीवरून अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून एक पोलिस उपायुक्त आणि दोन पोलिस निरीक्षका़ंचा यामध्ये समावेश आहे. यातील संबधित पोलिस उपायुक्तांवर यापूर्वीही वसुलीचा गुन्हा नोंद असून गुन्ह्यातील एक पोलिस निरीक्षक अटकेत असून त्याला खात्यातून बडतर्फ केलं आहे. तसेच तिसरा आरोपी हा सध्या स्थितीत पोलिस दलात कार्यरत आहे.यापूर्वी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करत पत्र लिहिले होते. त्याप्रकरणात चौकशी सुरू असताना परमबीरसिंग यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या ठाण्यामध्ये दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यानंतर ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



