
अर्थसंकल्प आणि महिला सक्षमीकरण : सर्वसमावेशक विकासाचा नवा आराखडा
विशेष प्रतिनिधी –
लोककल्याणकारी राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि विकासात्मक कार्यक्रमांना दिशा देण्याचे तसेच त्यांचा लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य अर्थसंकल्पाद्वारे साध्य होते. कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा मूलभूत हेतू म्हणजे सामाजिक आणि सार्वजनिक सेवांवर अधिकाधिक खर्च करून सर्वसमावेशक विकास साधणे हा आहे. हा प्राधान्यक्रम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरतो. त्यामुळे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणणारी एक प्रभावी यंत्रणा म्हणून अर्थसंकल्पाकडे पाहिले जाते.
विशेषतः महिलांसाठी करण्यात येणाऱ्या तरतुदी, विकासाभिमुख योजना आणि सक्षमीकरणपर कार्यक्रम यामुळे अर्थसंकल्प ही केवळ शासकीय आर्थिक प्रक्रिया न राहता महिला सक्षमीकरणाला चालना देणारे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारे एक महत्त्वपूर्ण पूरक माध्यम ठरते.
दरवर्षी केंद्र शासन तसेच प्रत्येक राज्य शासन आपला वार्षिक अर्थसंकल्प मांडत असते. हा अर्थसंकल्प केवळ उत्पन्न-खर्चाचा ताळेबंद नसून देशाच्या आणि राज्याच्या विकासदृष्टीचा आराखडा असतो. केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये संबंधित वर्षासाठीचे व्यापक आर्थिक नियोजन, पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींची निर्मिती, तसेच दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक तरतुदींवर विशेष भर दिला जातो. याशिवाय विविध मंत्रालये आणि विभागांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे धोरण आखले जाते. त्याचप्रमाणे, राज्य शासनाचा अर्थसंकल्प हा पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजनाचा आधारस्तंभ असतो. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण, महिला व बालकांसाठी कल्याणकारी योजना, शैक्षणिक सुविधांचा विस्तार, उद्योगविकास आणि रोजगारनिर्मिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचे जाळे उभारणे या बाबींवर राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष केंद्रित केले जाते. अशा प्रकारे केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवरील अर्थसंकल्प विकासाची दिशा निश्चित करणारे आणि सर्वांगीण प्रगतीस चालना देणारे महत्त्वपूर्ण धोरणात्मक साधन ठरतात.
केंद्र शासनाचा अर्थसंकल्प असो वा महाराष्ट्राचा राज्य अर्थसंकल्प दरवर्षी महिला वर्गाचे त्याकडे विशेष लक्ष लागलेले असते. कारण अर्थसंकल्प हा महिला सबलीकरणाची दिशा ठरविणारा आणि नव्या संधींची नांदी ठरणारा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. महिलाकेंद्रित योजना राबविताना कुटुंबाचे अर्थकारण सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिलांसाठी विशेष तरतूद व्हावी, अशी त्यांची अपेक्षा असते. महिलांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना, विद्यार्थिनींसाठी दर्जेदार व सुलभ शैक्षणिक सुविधा, तसेच महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यावर अर्थसंकल्पात भर दिला जावा, अशी महिला वर्गाची ठाम मागणी असते. यासोबतच महिला बचत गटांना अधिक प्रोत्साहन, लघुउद्योजिकांना व्यवसायवृद्धीसाठी आर्थिक पाठबळ, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची उपलब्धता, तसेच विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक सहाय्याच्या प्रभावी तरतुदी असाव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली जाते. अशा प्रकारे महिला वर्गासाठी अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक आराखडा नसून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा, सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो.



