
जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक लखपती दिदी; ७३ हजार ७४१ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर )- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत केंद्रीय ग्रामविकास विभागाचा ‘लखपती दिदी’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून याद्वारे बचत गटांशी निगडीत महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात वर्षभरात ७३ हजार ७४१ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘लखपती दिदी’, या योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे अशोक सिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, ‘आत्मा’ प्रकल्प उपसंचालक ए.यु.कुलकर्णी, सहा. आयुक्त मत्स्यविकास डॉ. मधुरिमा जाधव, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन चिंद्रे, श्रीमती सुवर्णा जाधव,जिल्हा कौशल्य विकास अधिकारी वराडे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एकूण ७३ हजार ७४१ लाभार्थ्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आवश्यक व्यवसायास सहाय्यभूत उपाययोजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकास्तरीय तसेच ज्या पद्धतीचा व्यवसाय करावयाचा आहे तो व्यवसाय ज्या विभागाचा अखत्यारीत येत आहे, त्या विभागाने संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क करुन त्यांचे उत्पादन, विक्री, अर्थ सहाय्य याबाबतचे दुवे मजबूत करुन कार्यान्वित करावे यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय करावी. याबाबतचे नियोजन सादर करण्यात आले.
सर्व तालुकास्तरीय यंत्रणा तसेच सर्व संबंधित विभाग यांनी आपल्या यंत्रणांमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करावे. या योजनेतून ग्रामिण पातळीवर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन ग्रामिण अर्थकारणाला चालना मिळेल,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगोतले.
०००००



