
मुंबई : फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापासूनच थंडी गायब झाली असून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबईत शनिवारी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असून यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचे उच्चांक नोंदवले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामानात बदल होत आहे. अनेक भागातील किमान तापमानातही वाढ नोंदली जात आहे, तर कमाल तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ झाली असून याआधी दोनदा ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, शनिवारी उन्हाच्या झळा वाढून पारा ३६ अंशावर गेला. हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात ३६. ३ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली, जे सामान्य तापमानाहून ४ अंशांनी अधिक होते. तर किमान तापमानातही वाढ झाली असून रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २३.६ तर सांताक्रूझ केंद्रात २२.४ किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे सकाळी जाणवणारा गारवा हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, रविवारीही शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.



