
देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट,मुंबईत तिसरी लाट येणार नव्हे आधीच आलीये: मुंबई महापौर
मुंबई प्रतिनिधी देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावत आहे. केरळसह अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्य सरकारला तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतोना दिसते आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तिसरी लाट आली असल्याचे सांगितले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असतानाच गणेशोत्सवासारखा मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यसरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करत एसओपी जाहीर केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सव साजरा करताना गर्दी करु नका असे आवाहन करताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. ‘कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, तर ती आली आहे,’ त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. येत्या १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होणार असून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा, तसेच या काळात घरीच थांबण्याचे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे. त्यापुर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट ही लोकांवर अवलंबुन आहे असे विधान केले होते. तसेच उर्जामंत्री नितिन राऊत यांनी देखील नागपुरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे सांगितले आहे. तसेच शहरात लवकरच कोरोना प्रतिबंधक नियम लागू करावे लागतील असे सांगितले आहे
दरम्यान, मुंबईत मंगळवारी ३५३ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४०४ एवढी होती. सध्या मुंबईत ३,७१८ कोरोनारुग्ण दवाखाण्यात उपचार होता आहेत.



