vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न

​अहिल्यानगर, प्रतिनिधी – सामान्य नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवून शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी शासनाने राबविलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून’ प्रशासन जनतेच्या दारी नेण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आयोजित समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, तहसीलदार रवी सतवन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सरपंच लताताई जगताप, उपसरपंच दीपक लोंढे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले , शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा लहान-मोठ्या कामांसाठी शासकीय कार्यालयांत अनेक फेरे मारावे लागतात. ही गैरसोय दूर करण्यासाठीच हे समाधान शिबिर अत्यंत उपयुक्त आहे. संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करून नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांचे त्वरित निवारण करावे, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ राबविण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण यासह सर्वच क्षेत्रांतील योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रा.शिंदे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या माध्यमातून केवळ विविध शासकीय योजनांची माहिती देणे किंवा लाभ वितरित करणे एवढ्यापुरते मर्यादित काम नसून, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडी-अडचणींचे जागेवरच निराकरण करण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे.

शासन आणि प्रशासन थेट जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या ऐकून तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जात आहे. नागरिकांना कार्यालयीन दिरंगाई, वारंवार फेऱ्या मारण्याची गरज किंवा माहितीअभावी होणारा त्रास कमी होऊन अनेक कामे एकाच ठिकाणी मार्गी लागणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या समाधान शिबिरात सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच आपल्या प्रलंबित अडचणी मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले , शासनाच्या सर्व योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या गावातच पोहोचावा या उद्देशाने हे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर जिल्ह्यातील सर्व मंडळ स्तरावर व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन सेवा देण्याच्या भूमिकेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि हे समाधान शिबिर यशस्वी व्हावे, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.​प्रास्ताविकात तहसीलदार रवी सतवन यांनी समाधान शिबिर आयोजनाची भूमिका विशद केली.

शिबिरात महसूल, आरोग्य, पुरवठा, महिला व बालविकास, ग्रामविकास व पंचायतराज, शिक्षण, कृषी, वनविभाग, भूमी अभिलेख, आदी विभागांच्या माध्यमातून विविध सेवा देण्यात आल्या. उत्पन्न दाखले, शिधापत्रिका, शासकीय योजनांसाठी अर्ज, आरोग्य तपासणी, निवेदनांची नोंद, मार्गदर्शन आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणे तातडीच्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली0000

संबंधित पोस्ट

सोमवारी डाक अदालतीचे आयोजन

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta